Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Tuesday, 30 June 2020

कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा महानायक- वसंतराव नाईक



''जीवन किती वर्ष जगला याला महत्त्व नाही
तर जीवन कसे जगला याला महत्त्व  आहे
नाहीतर
वटवृक्षाचचं सर्वांनी कौतुक केल असतं
चंदनाच नावही या जगात शिल्लक राहिलं नसतं''
      काही माणसं जन्माला येतात ते दुसऱ्यांच्या आयुष्याचे कल्याण करण्यासाठीच .असेच अतुलनीय व्यक्तीमत्व म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.वसंतराव नाईक.महाराष्ट्रासाठी अतुलनीय असे योगदान देणारे ,महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भुषवणारे ,खऱ्या  अर्थाने सर्व  घटकांचा विचार करणारी व्यक्ती म्हणजे वसंतराव नाईक.
        कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांचा जन्मदिन १ जुलै हा 'कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
      वसंतराव नाईक यांचा जन्‍म बंजारा समाजामध्‍ये सौ. होनुबाई फुलसिंग नाईक यांच्‍या पोटी दि. 1 जुलै 1913 रोजी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) या गावी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग (राठोड) नाईक यांनी गहुली हे गाव वसविले. चतुरसिंग हे तांड्याचे प्रमुख होते. म्‍हणून त्‍यांना लोक नाईक म्‍हणत. वसंतरावाचे बालपण गहुली गावीच गेले. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादवी, उमरी, भोजला, बान्‍सी या ठिकाणी झाले. त्‍या काळी वाहनांची सोय नसल्‍यामुळे ते चार-पाच मैल चालत जाऊन मोठ्या जिद्दीने व कष्‍टाने शिक्षण घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे पूर्ण केले.
     याच काळात त्यांना वाचनाची गोडी लागली. अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक लढा त्याचबरोबर महात्मा फुले आणि डॉ आंबेडकरांच्या कार्याचा वसंतरावांच्या मनावर प्रचंड प्रभाव पडत गेला. नागपूर हे त्या काळी सामाजिक राजकीय चळवळीचं केंद्र मानलं जायच. नागपुरातील अशा वातावरणात त्यांची राजकीय सामाजिक जडण घडण झाली. व २૪ व्या वर्षी पदवी मिळवल्या नंतर त्यांनी पुढे एल.एल.बी. ची पदवी प्राप्त केली. पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकीली केली. आकर्षक व्यक्तिमत्व मनमिळावू स्वभाव गरीब गरजू माणसांना मदत करण्याची वृत्ती यांमुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय वकील झाले.
         वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी वत्सलाबाई या ब्राह्मण समाजातील मुली बरोबर नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि जीवनातील पहिली क्रांती वसंतरावांनी केली . त्या काळी आंतरजातीय विवाह आणि नोंदणी पद्धतीने विवाह करणे याला क्रांतीच म्हणावे लागेल. बंजारा समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा यात बदल घडवून आणण्यासाठी वसंतरावांनी पुढाकार घेतला.
शेती आणि शेतकरी हे त्यांचे जिव्हाळ्याचेच नव्हे तर अभ्यासाचे विषय होते. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा सपाटा वसंतरावांनी लावला. जनमानसातील प्रसिद्धीमुळे १९५२ च्या विधानसभा निवडणुकीला वसंतराव पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहीले आणि निवडूनही आहे. उपमंत्री झाले. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना महसूल हे महत्त्वाचं खाते देण्यात आलं. मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले . त्यानंतर १९६३ ते १९७५ अशी सलग १२ वर्षे ते मुख्यमंत्री म्हणून राहिले.  राजकारणात सलग १२ वर्षे मुख्यमंत्री राहणं ही सोप्पी गोष्ट नाही. वसंतरावांनी ते करुन दाखवलं. वसंतरावंसारखे सर्वमान्यांतून आकाराला अालेले नेतृत्व महाराष्ट्राला लाभल्यामुळे राज्याचे भले झाले. महाराष्ट्राच्या जडण घडणीच्या अत्यंत महत्वाच्या काळात महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळू शकलं परिणामी विकासाला योग्य आणि गतिमान दिशा मिळाली.
      जसा पाण्याअभावी दुष्काळ पडतो तसा १९७१-७२ साली अन्नधान्याचा दुष्काळ होता. अन्ना अभावी लोकांचे मृत्य होण्याचे प्रमाण तेव्हा भयंकर होते. तेव्हा लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते. अन्नधान्याच्या समस्येवर, संकटावर मात करण्यासाठी त्यांनी 'जय जवान जय किसान ' असा नारा दिला होता. भारतीयांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अमेरिकेकडून गहू आयात करण्यात येत होता. पी.एल. ૪८० हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू अमेरिकेतून येत होता. अशी अन्नधान्याची टंचाई पाहून 'पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मला फाशी द्या' असं धाडसी विधान त्यांनी केलं आणि खरोखर महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत त्यांनी स्वयंपूर्ण करून दाखवला. शेतकऱ्यांना हायब्रीड बियाणे उपलब्ध करून दिले. कापूस एकाधिकार योजना राबविली. महाराष्ट्र दुधाची गरज पूर्ण करण्यासाठी गुजरात वर अवलंबून होता. त्यावर मात करण्यासाठी वसंतरावांनी कृषिमंत्री बाळासाहेब सावंत यांच्या मदतीने संकरित गाईंची खरेदी केली आणि दुग्धोत्पादनासाठी शेतकऱ्याना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिल. त्यांच्या या प्रयत्नामुळे, अल्पावधीतच महाराष्ट्रात धवलक्रांती घडुन आली. शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठांतील संशोधनामुळे महाराष्ट्राच्या कृषी विषयक ध्येयधोरणात वसंतरावांच्या काळात आमूलाग्र बदल घडून आला. उजनी,जायकवाडी,चासकमान, पेंच ,अप्पर वर्धा, धोम ही धरणे आणि पारस,खापरखेडा,कोराडी भुसावळ ही औष्णिक विद्युत प्रकल्प वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वीज आणि पाणी या मूलभूत गरजांची त्यांनी सोय केली. 'पाणी आडवा, पाणी जिरवा' ही योजना त्यांच्याच काळातील. दुष्काळावर मात करण्यासाठी वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली रोजगार हमी योजना वसंतरावांनी उचलून धरली. १९७२ च्या दुष्काळात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आली. पुढे केंद्राने देखील या योजनेची दखल घेऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणून हि योजना देशभरात राबविली. आज देखील ही योजना चालू आहे. १९६७ साली कोयना भूकंप झाल्यावर भूकंप ग्रस्त लोकांचे पुनर्वसन देखील त्यांनी केले. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यात वसंतरावांचा खारीचा वाटा आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर लोकशाही चे विकेंद्रीकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पंचायत राज समितीचे अध्यक्षपद वसंतराव नाईक यांच्याकडे होते. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी केलेल्या पंचायत राज विषयीच्या शिफारशीनुसारच आजच्या जिल्हापरिषद, पंचायत समिती चा कारभार चालू आहे.
       अशा महान व्यक्तीमत्त्वाला शतशःप्रणाम.
   संकलन व शब्दांकन
श्री.सूर्यवंशी एन.पी.(कोपरगाव)



No comments:

Post a Comment